विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
*शिवनी आरमाळसह १४ गावांच्या पाणी प्रश्नावर १० एप्रिलच्या आत मंत्रालयात बैठक : अंबादास दानवे*
बुलढाणा…
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज,२७ मार्चला शिवणी आरमाळ येथे भेट दिली. १४ गावांसाठी सिंचनाच्या पाण्याचा लढा उभारून बलिदान केलेले शेतकरी स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांची ना. दानवे यांनी सांत्वनपर भेट घेत कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत यांच्या पुढाकारातून जिल्हा शिवसेनेच्या वतीने ५ लक्ष रुपयांचा बचत ठेव स्वरूपातील (एफडी ) निधी नागरे कुटुंबीयांकडे ना.दानवे यांच्या हस्ते सोपवण्यात आला. आतापर्यंत अनेक नेते आले अन् पोकळ आश्वासने देऊन गेले मात्र शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी खऱ्या अर्थाने कर्तव्यनिधी दिल्याच्या भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवल्या..
यावेळी ना.दानवे यांनी स्व. कैलास नागरे यांच्या कुटुंबीयांकडून व ग्रामस्थांकडून पाणी समस्येची माहिती घेतली. यावर बोलतांना ना.दानवे म्हणाले की, मराठवाड्याला, विदर्भाला पाणी मिळू नये यासाठी एक लॉबी काम करत आहे. स्व. कैलास नागरे यांची आत्महत्या नाही तर बलिदान आहे, कारण कैलास यांनी केवळ स्वतःपुरता विचार केला नाही. १४ गावांच्या सिंचनाचा प्रश्न सुटला पाहिजे ही स्व. कैलास यांची भावना होती, असे ना.दानवे म्हणाले. पाणी मिळवण्याच्या या लढ्यात शिवसेना आपल्या सोबत आहे. १० एप्रिलच्या आत संबंधित अधिकाऱ्यांसोबत मंत्रालयात एक बैठक लावू असा शब्दही यावेळी ना.दानवे यांनी दिला.
कुटुंबाकडे लक्ष द्या; बहिणीची आर्त हाक
याप्रसंगी स्वर्गीय कैलास नागरे यांचे बंधू तसेच बहीण स्नेहलताई यांनी देखील आपल्या भावना मांडल्या. आमचा भाऊ हा आधुनिक शेतकरी होता .आज १५ दिवस झाले सगळे जण नुसते भेटी देऊन जात आहेत. मात्र कुटुंबाकडे कोणीच लक्ष द्यायला तयार नाही. परिवार उघड्यावर पडला आहे , इकडे लक्ष द्या अशी आर्त हाक स्नेहल ताई यांनी दिली. हाच धागा पकडून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण महाराष्ट्र आमचा परिवार आहे, नागरे परिवार उघड्यावर पडल्याच्या भावना या ठिकाणी स्नेहलताईंनी व्यक्त केल्या, मात्र संपूर्ण महाराष्ट्र हा शिवसेनेचा परिवार आहे. नागरे कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब ठामपणे उभे आहेत असेही ना. दानवे म्हणाले.
अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना चुकीची माहिती दिली..
गावकऱ्यांनी व्यक्त केल्या भावना..
स्वर्गीय कैलास नागरे यांच्या आत्महत्येच्या संदर्भामध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात निवेदन केले. यावेळी त्यांनी आठ किलोमीटर वरुन शिवनी आरमाळ व इतर गावांना पाणीपुरवठा करण्यासंदर्भात चा मुद्दा मांडला. मात्र मुख्यमंत्र्यांना अधिकाऱ्यांकडून चुकीची माहिती देण्यात आल्याचा स्पष्ट आरोप स्वर्गीय नागरे यांचे बंधू गणेश नागरे आणि गावकऱ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासमोर केला. महत्वाचे म्हणजे यावेळी सोबत असलेला नकाशा देखील त्यांनी समजावून सांगितला. नदी जोड प्रकल्प ह्या थापा मारल्या जात आहेत. आमचे नातू पणतू ते पाणी पाहतील की नाही याची शंका आहे, असेही गावकरी म्हणाले.
आठ किलोमीटर नव्हे तर केवळ ११० मीटर चारणी खोदली किंवा पाईप टाकले तरी या भागात पाणी येईल. खडकपूर्णा धरण भरल्यावर पर्यायी व्यवस्था म्हणून याकडे पाहिले जावे असेही यावेळी गावकरी म्हणाले.आम्ही कुणाचे राखीव किंवा हक्काचं पाणी मागत नाही आहोत तर धरण भरल्यानंतर जे पाणी उरतं ते आम्हाला मिळावं अशी मागणी स्वर्गीय कैलास नागरे यांची होती आणि तीच आमची मागणी आहे असे गावकरी यावेळी बोलताना व्यक्त झाले.
स्वर्गीय नागरे यांच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी : आमदार खरात
आ सिद्धार्थ खरात यांनी देखील शिवसेनाही पूर्णपणे नागरे कुटुंबीयांच्या पाठीशी उभी आहे,असे सांगीतले. होळीच्या दिवशी स्वर्गीय नागरे यांनी आहुती दिली. शेती ,मातीच्या प्रश्नावर बलिदान दिलं. ती आहुती वाया जाऊ देणार नाही, स्व.कैलास यांच्या पत्नी यांना शासकीय नोकरी देण्याची देखील आपली मागणी आहे. या संदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करू,असे आमदार खरात म्हणाले.
शिवसेना ही सत्तेसाठी नाही तर समाजासाठी : जालिंदर बुधवत
हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारणाचे विचार आम्हाला दिले आहेत. पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आले आहेत. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच टप्प्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला होता. स्वर्गीय नागरे या आदर्श युवा शेतकऱ्याच्या आत्महत्यामुळे समाजमन हेलावले आहे. शिवसेना देखील पूर्णपणे नागरे कुटुंबीयांच्या पाठीशी असून उद्धव साहेबांच्या सूचनेनुसारच जिल्हा शिवसेनेकडून ही मदत नव्हे तर कर्तव्यनिधी आम्ही या कुटुंबीयांकडे सोपवला आहे अशा भावना जालिंदर बुधवत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या.
यावेळी संपर्क प्रमुख प्रा नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत, वसंतराव भोजने, छगन मेहेत्रे, सौ. जयश्रीताई शेळके, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ विजयाताई खडसन, जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे, प्रा डी.एस. लहाने सर, जिल्हा समन्वयक संदीप शेळके, युवासेना जि प्र नंदु कऱ्हाडे, उप जिल्हा प्रमुख प्रा. आशिष रहाटे, बद्रि बोडखे, तुकाराम काळपांडे, तालुका प्रमुख दादाराव खार्डे, महेंद्र पाटील, निंबाजी पांडव, किसनराव धोंडगे, प्रा.सिद्धेश्वर आंधळे, माजी जि प सदस्य दिलीप वाघ, शहर प्रमुख गोविंदराव झोरे, किशोर गारोळे, श्रीकांत नागरे, राजू बुधवत, तारामती जायभाये, मोहम्मद सोफियान, म्हसाजी वाघ, आकाश घोडे, रणजीत मरमठ, उल्हास भुसारे, गजानन घुगे, अक्षय ठाकरे, अजय शिवरकर, नितेश देशमुख, नागेश पऱ्हाड, गजानन डहाळके, दिलीप चौधरी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शिवनी अरमाळ या गावातील माता भगिनी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते…